वारसा: भारतीय ठेवा विसरत चाललेली आजची पिढी : उल्का देवरुखकर
- Neel Writes

- Jun 13, 2025
- 2 min read
आजच्या आधुनिक युगात भारतीय वारसा, जो आपला अमूल्य ठेवा आहे, तो दुर्लक्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे. वारसा हा दोन प्रकारांचा असतो – सांगेय (Tangible) आणि असांगेय (Intangible). सांगेय वारसा म्हणजे आपली ऐतिहासिक स्मारके, मूर्तिशिल्पे, वास्तुकला, आणि कलाकुसरीचे सुंदर नमुने, तर असांगेय वारसा म्हणजे वेद, शास्त्रे, संगीत, कला आणि परंपरा, ज्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला आहे.
आजच्या पिढीकडे पाहिले, तर असे जाणवते की त्यांना भारतीय वारशाबद्दल फारसा रस नाही. इतिहासातील स्मारकांवर किंवा कलाकृतींवर नजर टाकली तरी त्यामागील कथा, त्यांचे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्व समजून घेण्याचा प्रयत्न होत नाही. असांगेय वारसा जसे की वेद, उपनिषदे, शास्त्र, आणि अध्यात्म, याबद्दल तर अजिबात जागरूकता नाही.
पश्चिमी संस्कृतीचा अतिरेक आणि भारतीय वारशाचे विस्मरण
पश्चिमी जीवनशैलीला कवटाळताना भारतीय परंपरेतून मिळालेल्या नैसर्गिक, वैज्ञानिक आणि अध्यात्मिक ज्ञानाचा विसर पडत चालला आहे. भारतीय औषधशास्त्र, म्हणजे आयुर्वेद, हे जगभरात मान्यताप्राप्त असूनही, आपल्याकडे याकडे दुर्लक्ष होते आहे. नैसर्गिक साधनांनी मिळणारी सौंदर्यशास्त्राची शिकवण दुर्लक्षित करून कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांकडे पिढी आकर्षित होत आहे.

'रील्स'च्या दुनियेत वाचन आणि अध्यात्माचा विसर
आज सोशल मीडियाच्या 'रिळ्स'च्या जगात लोकांना वाचनाचा, शिकण्याचा आणि आत्म्याचा पोषण करण्याचा वेळ नाही. परंतु हे विसरता कामा नये की, अध्यात्म आणि आत्मचिंतन हे जीवनाला वेगळी दिशा देतात. भारतीय वारसा हा फक्त इतिहास नाही, तर तो जीवन जगण्यासाठीचा मार्गदर्शक आहे. त्यातील कथा, तत्त्वज्ञान, आणि मूल्ये समजून घेतल्यास ती मनुष्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडू शकतात.
संपत्ती नेहमीच पैशात नसते, ती वारशातही असते
भारतीय वारसा आपल्याला नैसर्गिक, सामाजिक, आणि आध्यात्मिक संपत्ती देतो. परंतु त्यासाठी आपल्याला आपल्या पिढीला जागरूक करणे गरजेचे आहे. अध्यात्म, साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य हेच खरे वैभव आहे.

तरुणाईला संदेश
आजच्या तरुणांनी आपल्या वारशाबद्दल जाणून घेतले पाहिजे. स्मारकांची कहाणी समजून घेतली पाहिजे, वेद-शास्त्रांचे वाचन केले पाहिजे, आणि आयुर्वेद व अध्यात्म यांचा अंगीकार केला पाहिजे. कारण खरी सुंदरता ही केवळ चेहऱ्यावर नसते, ती व्यक्तीच्या आत्म्यातून आणि विचारांतून झळकते. भारतीय वारशाचा सन्मान करून, त्यातून शिकून आपण आपले जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण करू शकतो.




Comments